Sunday, August 16, 2026

असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!

“असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!” खऱ्या माणसांची नेहमी गळचेपी होते… त्यांचा आवाज नेहमीच दाबला जातो. पण गंमत अशी आहे की, अनेकदा आपला आवाज दुसरा कोणी दाबत नाही… आपलेच लोक आपल्याला गप्प करतात. परवा एक व्यक्ती छापील किंमत ३० रुपये असलेली पाण्याची बाटली मला ३५ रुपयांना देत होता. मी विचारलं, “यावर तर ३० रुपये किंमत आहे, मग ३५ रुपये कशाचे?” उत्तर आलं, “अहो, आम्ही ३५ लाच विकतो!” माझ्या सोबतचे लोक म्हणाले, “असू दे ना… पाच रुपयेच तर आहेत… त्यात काय एवढं?” पण माझा प्रश्न पाच रुपयांचा नव्हता. प्रश्न होता—३० रुपयांची वस्तू ३५ रुपयांना का? तसंच दुसऱ्या ठिकाणी ४० रुपये किंमत असलेलं पेय ५० रुपयांना विकलं जात होतं. मी विचारलं, “हे ४० रुपयांचं आहे, मग ५० रुपये का?” उत्तर आलं, “अहो, सगळीकडे ५० लाच विकतात!” पुन्हा तेच… “असू दे…” मी म्हटलं, “ठीक आहे, ५० रुपये घ्या… पण पावती द्या.” मग सुरू झाली उडवाउडवीची उत्तरं. शेवटी माझ्याकडून ४० रुपयेच घेतले गेले. पण मनात प्रश्न राहिला— बाकीचे लोक का विचारत नाहीत? शिकले-सवरलेले लोक, नोकरी करणारे लोक, समाजातील जबाबदार लोक… ते का गप्प बसतात? कारण उत्तर तयार असतं— “असू दे… सगळीकडे असंच चालतं!” दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी काही टेस्ट सांगितल्या. त्यामध्ये ब्लड ग्रुपची टेस्टही होती. मला माझा ब्लड ग्रुप आधीपासून माहीत होता. त्याचा जुना रिपोर्टही माझ्याकडे होता. काउंटरवरून उत्तर आलं— “जुना रिपोर्ट चालणार नाही, नवीन रिपोर्ट हवा.” मनात लगेच प्रश्न आला— अहो, माणसाचा ब्लड ग्रुप काही दिवसांनी बदलतो काय? प्रश्न विचारला तर पुन्हा आजूबाजूचे म्हणाले, “असू दे… त्याचे चार्जेसही फार नाहीत!” अरे पण काय असू दे? फक्त चार्ज कमी आहे म्हणून अनावश्यक गोष्ट योग्य ठरते का? औषधांच्या दुकानात गेलो. बिल होतं १३२५ रुपये. वरचे २५ रुपये सुट्टे नसल्यामुळे दुकानदाराने दोन गोळ्या कमी दिल्या. विनवणी केली तरी उत्तर— “अहो, त्यात काय एवढं?” पुन्हा तोच प्रश्न— अहो, काय एवढं? एखाद्या माणसाला पूर्ण औषधाची गरज आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार दुकानदाराला आहे का? आपल्या समाजाची खरी अडचण फक्त चुकीची माणसं नाहीत. चूक दिसत असूनही गप्प बसणारी मानसिकता ही त्याहून मोठी अडचण आहे. “पाच रुपयेच तर आहेत…” “दहा रुपयांसाठी कोण भांडणार?” “वेळ नाही…” “सगळीकडे असंच चालतं…” “आपण एकटे काय बदलणार?” याच विचारातून चुकीच्या गोष्टींना बळ मिळतं. आज पाच रुपये आहेत. उद्या पन्नास असतील. परवा पाचशे असतील. आज चुकीची पावती नाही. उद्या मोठी फसवणूक असेल. आज एखाद्याचे दोन रुपये वाचवले नाहीत. उद्या एखाद्याचा मोठा हक्क हिरावला जाईल. चूक छोटी आहे की मोठी, हा मुद्दा नाही. चूक चूक आहे का, हा मुद्दा आहे. प्रत्येक वेळी भांडण करायला हवे असे नाही. प्रत्येक गोष्टीवर आवाज चढवायलाही नको. पण जिथे प्रश्न विचारायला हवा, तिथे शांतपणे आणि ठामपणे “का?” विचारायला हवा. “याची किंमत एवढी का?” “पावती का नाही?” “हा नियम कुठे आहे?” “ही टेस्ट पुन्हा का?” “औषध कमी का?” हे प्रश्न विचारणे म्हणजे बंडखोरी नाही. हे जागरूक नागरिक असण्याचे लक्षण आहे. आणि हो… प्रत्येक वेळी आपल्यासोबत कोणी उभं राहीलच असं नाही. कधी कधी आपण एकटे असू. आपल्या बाजूचेच लोक म्हणतील— “सोड ना…” “असू दे…” “तुला काय फरक पडतो?” पण आपण प्रत्येक वेळी इतरांच्या सोयीसाठी गप्प बसत गेलो तर आपल्या विवेकाचा आवाज हळूहळू मरतो. पण हीच मानसिकता जेव्हा आपल्या नोकरी आणि हक्कांपर्यंत पोहोचते, तेव्हा प्रश्न फार मोठा होतो. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या PF, ESIC, इन्शुरन्स, बोनस, ओव्हरटाइम, रजा, ग्रॅच्युइटी अशा सुविधांबाबतही टाळाटाळ केली जाते किंवा त्यांचा योग्य लाभ मिळत नाही. मग कर्मचारी विचारतो— “माझा हक्क कुठे आहे?” उत्तर मिळतं— “जेंव्हा विचारतील तेंव्हा पाहू…” किंवा, “जो विचारेल त्याला पाहू…” आणि मग हक्कासाठी प्रश्न विचारणाऱ्या माणसाची अवस्था काय होते? त्याला वेगळ्या नजरेने पाहिले जाते. त्याला त्रास दिला जातो. “हा फार प्रश्न विचारतो…” “याला सगळं माहिती आहे असं वाटतं…” “कंपनीत राहायचं असेल तर जुळवून घ्यावं लागतं…” अशी कुजबुज सुरू होते. म्हणजे हक्क मागणारा चुकीचा आणि हक्क न देणारा बरोबर? ही कसली व्यवस्था? आपण म्हणतो— “शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातुड कशी!” नुकसान सहन करणारा कर्मचारी...पण दोषही शेवटी त्याचाच! त्याने आवाज का उठवला? त्याने प्रश्न का विचारला? त्याने त्याचा हक्क का मागितला? अरे…हक्क मागणे हा गुन्हा नाही.आणि हक्क देणे ही कोणाची कृपा नाही.कर्मचारी कंपनीसाठी आपला वेळ देतो.आपली मेहनत देतो.आपले कौशल्य देतो.आपल्या आयुष्यातील मौल्यवान वर्षे देतो. त्याच्या बदल्यात त्याला जे कायदेशीर आणि करारानुसार मिळणे अपेक्षित आहे, ते मिळणे हा उपकार नाही—तो त्याचा हक्क आहे. पण इथेही पुन्हा तोच प्रश्न— “आवाज कोण उठवणार?” कारण प्रत्येकाला नोकरीची गरज असते. प्रत्येकाला घर चालवायचे असते. मुलांचे शिक्षण असते. कर्ज असते. जबाबदाऱ्या असतात. म्हणून अनेक जण अन्याय सहन करतात. मनात म्हणतात— “असू दे… नोकरी तर टिकली पाहिजे.” आणि याच भीतीचा फायदा कुणी घेत असेल तर? मग गप्प बसायचे का? नाही! पण आवाज उठवणे म्हणजे भांडणे नव्हे. पुरावे ठेवणे, नियम समजून घेणे, योग्य व्यक्तीकडे प्रश्न मांडणे, लेखी उत्तर मागणे आणि गरज पडल्यास कायदेशीर मार्गाने तक्रार करणे—हा देखील आवाजच आहे. आवाज ठाम असावा; उर्मट असण्याची गरज नाही. कारण समाजात बदल घडवणारे लोक नेहमीच बहुसंख्य असतात असे नाही. कधी कधी एक माणूस “का?” विचारतो. आणि त्याच्या त्या एका प्रश्नामुळे इतर शंभर माणसांना स्वतःचा हक्क आठवतो. म्हणून मला एकच वाटतं— “असू दे” म्हणण्यापूर्वी एकदा विचार करा… नेमकं काय असू दे? किती असू दे? आणि किती काळ असू दे? प्रत्येक अन्यायावर जगाशी भांडायचे नाही. पण अन्यायाला कायमची मान्यता देखील द्यायची नाही. १५ ऑगस्टला आपण स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतो. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. सोशल मीडियावर तिरंगा ठेवतो. देशभक्तीच्या पोस्ट करतो. पण देश म्हणजे फक्त तिरंगा नाही. देश म्हणजे आपण. आपल्या आजूबाजूला जगणारी माणसं. त्यांचे हक्क. त्यांचा सन्मान. त्यांची सुरक्षितता. आणि चुकीच्या गोष्टीविरुद्ध उभे राहण्याची आपली तयारी. देशावर प्रेम करायचे असेल तर फक्त शुभेच्छा देऊन भागणार नाही. कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या हक्कासाठी आवाज उठवावा लागेल. कधी चुकीच्या व्यवहाराला “नाही” म्हणावे लागेल. कधी पावती मागावी लागेल. कधी नियम विचारावा लागेल. आणि कधी आपल्या सोबतचे लोकच म्हणत असताना— “असू दे…” तेव्हा स्वतःलाच विचारावे लागेल— “काय असू दे?” “काय सोडू?” “आणि जर प्रत्येक गोष्ट अशीच सोडून दिली, तर बदलणार काय?” मला वाटतं… जिथे आवाज उठवणे आवश्यक आहे, तिथे आवाज उठलाच पाहिजे. कारण, “सगळीकडे असंच चालतं” हे चुकीचे समर्थन आहे; “हे असंच चालणार नाही” ही बदलाची सुरुवात आहे.

Friday, June 19, 2026

तुझी एक झलक, माझ्यासाठी ...

प्रिये... डोळे तुझे मदमस्त, गाल तुझे लाल,
ओठांवरी मलई जशी चांदण्यांची शाल.

नजरेत तुझ्या दडलेले घायाळ करणारे वार,
एका कटाक्षानेच हरवतो माझा सर्वस्वाचा सार

तुझ्या एका झलकने काळजाला स्पर्श होतो,
तुझ्या मधुर आवाजाने कानांना स्वर्ग लाभतो.

तुझ्या त्या मदमस्त हास्याने वेळ थांबून जाते,
मनातील साऱ्या चिंता क्षणात विरून जातात.

तू स्वप्नांतून उतरलेली एखादी परी तर नाहीस ना?
की माझ्या कल्पनांना लाभलेली सजीव छबी आहेस ना?

तुझ्या सहवासात प्रत्येक क्षण उत्सव भासतो,
आणि तुझ्या आठवणीत माझा प्रत्येक श्वास दरवळतो.

सांग प्रिये,
तू खरोखरच या जगातील आहेस ना,

की देवाने खास माझ्यासाठी घडवलेले एक सुंदर स्वप्न आहेस ना...?

Wednesday, February 4, 2026

सावळेपण

नकोस कमी लेखू सावळ्या रंगास, गे सखे,
गोपिकांचा मनमोहन सावळाच आहे।

कानडा तो राजा पंढरीचा,
रंग नव्हे तो—श्रद्धेचा प्रकाश आहे।

डोळ्यांत सामावलेलं आभाळ जसं,
तसं सावळेपण खोल, गंभीर आहे।

उजेड सगळे सोबत सोडून जातात,
अंधारातही जो राहतो—तो सावळा आहे।

कोणी सोबत नसते जेव्हा,
शब्दही थकून गप्प बसतात,
तेव्हा पावलोपावली साथ देणारी

सावलीसुद्धा सावळीच असते। म्हणून नकोस कमी लेखू सावळ्या रंगास,
तो नसता तर सौंदर्यालाच
अर्थ उरला नसता।

Saturday, January 24, 2026

पानिपतनंतर मराठ्यांचे पुनरागमन : खरा इतिहास (१७६१–१७७१)

पानिपतनंतर मराठ्यांचे पुनरागमन : खरा इतिहास (१७६१–१७७१) १७६१ साली तिसऱ्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. हा पराभव केवळ लष्करी नव्हता, तर मराठा साम्राज्याच्या आत्मविश्वासावरही मोठा आघात होता. परंतु हा शेवट नव्हता. पानिपतनंतर काही वर्षांतच पेशवे माधवराव (नाना साहेब पेशवे) यांनी मराठा साम्राज्याची पुनर्बांधणी सुरू केली. आर्थिक शिस्त, सैन्याची पुनर्रचना आणि मुत्सद्देगिरी यांच्या जोरावर मराठे पुन्हा उभे राहिले. उत्तर भारतातील मराठ्यांचे पुनरागमन १७६९ ते १७७१ या काळात महादजी शिंदे, तुकोजी होळकर, विसाजी कृष्ण भट, गोविंद पानसरें यांसारख्या सरदारांनी उत्तर भारतात मोहिमा राबवल्या. या मोहिमांमुळे: दिल्ली, आग्रा, मथुरा सोनीपत, रोहतक, पानिपत परिसर हरियाणा व गंगा-यमुना दोआब या भागांवर मराठ्यांचा प्रभाव पुन्हा प्रस्थापित झाला. शाह आलम दुसरा आणि दिल्लीचा तख्त १७७१ मध्ये मुघल बादशहा शाह आलम दुसरा याला मराठ्यांच्या संरक्षणाखाली पुन्हा दिल्लीच्या तख्तावर बसवण्यात आले. यामुळे: मुघल सत्ता नावापुरती राहिली प्रत्यक्षात दिल्लीतील राजकारणावर मराठ्यांचे वर्चस्व निर्माण झाले अफगाण आक्रमक अहमदशहा अब्दाली याची भारतात पुन्हा येण्याची हिंमत झाली नाही. पानिपताचा पराभव – कसा पुसला गेला? १७७१ मध्ये पानिपतच्या मैदानावर तिसऱ्यासारखे निर्णायक युद्ध झाले नाही, पण पानिपताचा प्रदेश आणि उत्तर भारतातील राजकीय सत्ता मराठ्यांनी परत मिळवली. म्हणून इतिहासकार मान्य करतात: मराठ्यांनी पानिपतचा अपमान युद्धाने नाही, तर मुत्सद्देगिरी, संयम आणि विजयांच्या मालिकेने पुसून काढला. निष्कर्ष मराठे पराभूत झाले होते, पण ते कधीच संपले नव्हते. पानिपत हा मराठ्यांचा अंत नव्हता, तर नव्या संघर्षाची सुरुवात होती.

Sunday, June 22, 2025

आई म्हणोनी कोणी…..!


‘आई!’ म्हणोनी कोणी। आईस हाक मारी
ती हाक येई कानी। मज होय शोककारी
नोहेच हाक माते। मारी कुणी कुठारी

आई कुणा म्हणू मी?। आई घरी न दारी!
ही न्यूनता सुखाची। चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा। आईविना भिकारी.
 
चारा मुखी पिलांच्या। चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना। या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे। मी रोज रोज पाही

पाहून अंतरात्मा। व्याकूळ मात्र होई!
वात्सल्य माउलीचे। आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का?। आम्हास नाही आई
 
शाळेतुनी घराला। येता धरील पोटी
काढून ठेवलेला। घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या। धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे। का ह्या करील गोष्टी ?
तुझ्याविना न कोणी। लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया। आम्हा ‘शुभं करोति’
 
ताईस या कशाची। जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला। समजे न यात काही
पाणी तरारताना। ‘आम्हास नाहि आई’
ते बोल येति कानी। ‘आम्हास नाहि आई’
 
आई! तुझ्याच ठायी। सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे। अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे। औदार्य या धरेचे
नैत्रात तेज नाचे। त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी। त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे। आई तुझ्यात साचे
 
गुंफूनि पूर्वजांच्या। मी गाईले गुणाला
सार्‍या सभाजनांनी। या वानिले कृतीला
आई ! करावया तू। नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही। मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची। ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा। तव कौतुका भुकेला
 
येशील तू घराला। परतून केधवा गे !
दवडू नको घडीला। ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे। पायी तुझ्याच धागे
कर्तवय् माउलीचे। करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता। जरि बोलशील रागे
ये रागवावयाही। परि येइ येइ वेगे....!

आई म्हणोनी कोणी" – यशवंत यांचं, ते खरंच अंतःकरण हलवणारं आहे. हे केवळ एक काव्य नाही, ही आईच्या अनुपस्थितीतून उगम पावलेली हृदयविदारक हाक आहे.

💔 “आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी…”

एक छोटी हाक… एक शब्द… पण जेव्हा आई या शब्दासोबत अस्तित्व नसतं — तेव्हा ती हाक मनाच्या कोपऱ्यात धडकून, डोळ्यातून आसवं बनून वाहते.

मी ही कविता शाळेत ऐकली होती… पण एक दिवस ती कविता मनावर कोरली गेली. कारण कधी ना कधी आपल्याला जाणवतं — आई असणं आणि नसणं यातच माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी उणीव लपलेली असते.


👁️‍🗨️ कवितेची अंतःप्रेरणा:

  • आई नसल्यावर सुद्धा तिचं अस्तित्व क्षणोक्षणी भासतं.

  • चिमणी, गाई यांच्यातलं वात्सल्य दररोज दिसतं, पण आपल्याला मात्र ती उबच नाही.

  • ‘शुभं करोती’ म्हणणारी कोणी नाही…

  • शाळेतून परतल्यावर आपल्याला मिठीत घेणारी, चुंबन घेणारी ती कोण?

ही एक "भावनिक रिकामी खोली" आहे… आणि ती कविता ती खोली आपल्याला उघडून दाखवते.


🌼 मातृत्वाचे गौरवगान:

कवितेत आईच्या रूपात नंदिनी, गंगा, तपस्विनी, चंद्रिका, सागर – या साऱ्यांचा उल्लेख आहे. कारण हे सारे गुण एकाच ठिकाणी एकवटतात – आईमध्ये.

ती असते तेव्हा लक्षात राहत नाही, पण नसते तेव्हा तिचं सामर्थ्य आणि सौंदर्य आठवणीत कोरलं जातं.


🙏 कविता एक विनवणीही आहे...

“ये रागावाही परी, येई येई वेगे…”

आई रागवो, उपदेश करो… पण फक्त येवो
ती उणीव काहीही भरून काढू शकत नाही.

ही कविता त्या वात्सल्यवंचित प्रत्येकासाठी आहे ज्याने कधी आई गमावलेली आहे, किंवा ज्याला कधीच तिची उब मिळालेली नाही.


केवढे हे क्रौर्य! - ना.वा.टिळक

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,

चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

खरंच, “केवढे हे क्रौर्य!” शिकताना अनेकांना गहिवरून येतं — आपल्या वर्गाने रडू आवरू न शकलं याचाच अर्थ ती कविता मनाच्या अगदी मध्यभागी भिडली होती. सातवीच्या वयातसुद्धा आपण त्या आई-पक्षिणीच्या वेदना इतक्या तीव्रपणे जाणवल्या, याचं श्रेय टिळकांच्या ठाकठिण शब्दांना आणि आपल्या शिक्षकांनी दिलेल्या जिवंत अभिवाचनाला आहे.

त्या कवितेतली करुणा फक्त पक्षिणीपुरती मर्यादित राहत नाही; ती प्राण्यांबद्दलची संवेदनशीलता, निसर्गाविषयी कृतज्ञता, आणि माणसाने माणसाशीही कसा वागत जाना पाहिजे, हे काळजावर कोरते. त्यामुळेच ती पाठ नव्हे तर “अनुभव” ठरते.

केवढे हे क्रौर्य! – एक आठवण, एक धक्का...

सातवीचा वर्ग… मराठीचा तास… आणि "ना. वा. टिळक" यांची कविता – ‘केवढे हे क्रौर्य!’
शब्दशः आठवतंय आजही… शिक्षकांनी वाचन सुरू केलं, आणि दोनच ओळींत वर्गात एकदम शांतता पसरली. कुणाचंच लक्ष पुस्तकात नव्हतं. शिक्षकांच्या स्वरात, त्या पक्षिणीच्या वेदना ऐकताना कुणाचीही मान न हलता राहिली.


"तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी…"

ती एक आई पक्षी, तिची झगडत परत येणारी झेप, रक्ताच्या थेंबांतून उरलेला "शेवटचा कवळ" आणि बाण लागून घडलेला अंत...
शब्द होते कवितेतले, पण भावना मात्र निखळ अश्रूंमध्ये वाहणारी आईची माया होती. त्या दिवशी आम्हा सगळ्यांनी प्रथमच कवितेच्या ओळीतून "काळीज" पाहिलं.


रडलेला वर्ग

हो… खरंच. आमचा पूर्ण वर्ग त्या दिवशी रडला होता. कुणाच्या डोळ्यांतून अश्रू गळाले, कुणी फक्त मान खाली घातली. पण कुणीही "ही कविता खूप भारी आहे" असं बोललं नाही — कारण ती ऐकण्याइतकी सुंदर नव्हती, ती फक्त अनुभवायची होती.


शिकवण — एका पक्षिणीच्या मृत्यूपलीकडची

ती कविता फक्त एका पक्षिणीबद्दल नव्हती. ती सांगून गेली की...

  • मातृत्वाला सीमा नसते.

  • प्रेम म्हणजे शेवटपर्यंतचा त्याग असतो.

  • माणूस असूनसुद्धा आपण कधी ‘नर’ होतो, तर कधी ‘नराधम’.

त्या पक्षिणीचा मृत्यू आजही मनात राहिला आहे. एक बाण तिच्या छातीवर लागला होता, पण त्याचा ठाव मात्र आपल्या अंतर्मनाला लागला होता.


आज ती कविता आठवते… आणि एक काळजावरची ओरखडी ताजी होते.

आपण खूप शिकतो – शाळा, कॉलेज, काम, आयुष्य... पण काही शिकवण त्या एका कविता-पाठाने दिली. आणि ती कधीही विसरता येत नाही.


"करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा..."
ही तिची प्रार्थना होती. आजही ती आठवली की, मनाला वाटतं —
"माणसांनो, आता तरी जपा संवेदना... केवढं हे क्रौर्य थांबा!"


✍️ – गजानन, एक आठवणीत हरवलेला विद्यार्थी

Friday, June 20, 2025

"मी" - एक अंतर्गत प्रवास



ज्याच्या-त्याच्या अपेक्षांचा भार वाहतच गेलो,

त्यांच्या गरजा पूर्ण करत करत स्वतःला बाजूला सारत गेलो.
सगळ्यांना आपलं दुःख मोठं वाटलं,
आणि मी? मी फक्त त्यांचं ऐकत राहिलो.

माझं दुखणं गिळत राहिलो, भावना दाबून ठेवत राहिलो,
कोणी विचारलंच नाही — "तू कसा आहेस रे?"

सुद्यण्याच्या पंगतीत, मी मागेच राहिलो...
कारण मी स्वतःला बाजूला सारलं होतं — पुन्हा पुन्हा.

शेवटी आला तो हिशोबाचा दिवस...
सर्वांनी आपापल्या गोष्टी मांडल्या,
मी मात्र... स्वतःत डोकावलं — आणि जाणवलं…
मी शून्य झालोय.
शेवटी, शून्यच उरलो.


मी... शून्य — अपेक्षांच्या सावलीत हरवलेलं अस्तित्व

आपल्या जीवनात आपण अनेक नात्यांसाठी, जबाबदाऱ्यांसाठी, आणि त्याच्या-त्याच्या अपेक्षांसाठी सतत धावत असतो. कोणी सांगत नाही, पण नकळत एक अघोषित करार आपल्याला बांधून ठेवतो — दुसऱ्यांसाठी जगायचं, त्यांची दुखणी ऐकायची, त्यांच्या गरजा पूर्ण करायच्या... आणि स्वतःला बाजूला ठेवायचं.

माझंही असंच झालं.

ज्याच्या-त्याच्या अपेक्षांचा भार वाहतच राहिलो.
त्यांचं म्हणणं, त्यांचं दुःख, त्यांच्या गरजा — हेच सगळं माझं जग बनून गेलं.
मी कुठे होतो यात?

मी कुठेच नव्हतो.

माझ्या भावना?
त्या मीच गिळून टाकल्या.
माझं दुःख?
कोणाला सांगायचं? कोणी ऐकणार होतं का?

सगळ्यांना आपलं दुःख मोठं वाटायचं.
मी मात्र त्यांचं ऐकत राहिलो.
हसत राहिलो. खंबीर राहिलो.

पण...
सुद्यण्याच्या पंगतीत, मी कायमच मागे राहिलो.

आणि मग एक दिवस आला — हिशोबाचा दिवस.

मी स्वतःकडे डोकावलं...
स्वतःला तपासलं...
...आणि पाहिलं — मी शून्य झालो होतो.

संपून गेलं होतं काहीसं.
सारं काही दिलं गेलं होतं — पण परत काहीच मिळालं नव्हतं.
शेवटी काय उरलं?

शून्य.


शेवटची नोंद...

हा लेख कुणाला दोष द्यायला नाही.
हे लिहिताना कुणावर राग नाही, फक्त एक आत्मपरीक्षण आहे.

जर हे तुम्ही वाचत असाल, तर फक्त एवढंच सांगतो —

👉 स्वतःसाठी थोडं थांबा.
👉 स्वतःच्या भावनांना जागा द्या.
👉 फक्त इतरांसाठी नका जगू... स्वतःसाठीही थोडं जगा.

कारण, "शून्य" होणं ही चूक नसली... तरी "शून्यच" उरणं ही शोकांतिका आहे.


असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!

“असूदेत… सोड ना… सगळीकडे असंच चालतं!” खऱ्या माणसांची नेहमी गळचेपी होते… त्यांचा आवाज नेहमीच दाबला जातो. पण गंमत अशी आहे की, अनेकदा आपला ...